पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कार पडली; बुडून चौघांचा मृत्यू ...
हिंगोली: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कार कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री सेनगावजवळ घडली आहे. सध्या सेनगाव जिंतूर रस्त्याचे काम सुरु असून रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साठले होते. मात्र, ठेकेदाराने रस्त्यावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे एक कार खड्ड्यात कोसळली. कार खड्ड्यात पडल्यानंतर गाडी लगेच लॉक झाली. त्यानंतर पाण्यात बुडून गाडीतील चारही जणांचा मृत्यू झाला.
रविवारी रात्री अंधारात पाण्याने भरलेला खड्डा चालकाच्या नजरेला पडला नाही. त्यामुळे कार वेगाने जाऊन खड्ड्यात आदळली. कार खड्ड्यात पडल्यानंतर गाडी लगेच लॉक झाली. त्यामुळे गाडीतील चौघांनाही सावरण्यासाठी वेळही मिळाला नाही. खड्डा पाण्याने भरला असल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन चौघांचाही मृत्यू झाला.
ही कार खड्ड्यात पडल्यानंतर बराचवेळ कोणालाही पत्ता लागला नव्हता. अखेर काहीवेळानंतर एक दुचाकीस्वार याच मार्गावरुन जात होता. त्यावेळी रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात त्याला कारच्या हेडलाईटचा प्रकाश दिसला. तेव्हा या दुचाकीस्वाराने जवळच्या एका धाब्यावर जाऊन या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका आली आणि कारमधील चौघांनाही बाहेर काढण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेईपर्यंत चौघांचाही मृत्यू झाला होता. चौघेही मृत लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा येथील रहिवासी आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून पुलाचं काम सुरु असूनही ठेकेदाराकडून रस्त्यावर कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आला नव्हता. रस्ता वळणाचा असल्याने रस्त्यावर सुरू असलेल्या पुलाचे काम वाहन चालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या चौघांचाही बळी गेला आहे. संबंधितावंर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी येथील स्थानिक करत आहेत.