गेल्या वर्षभरात ४८ हजार जणांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू
२०२० मध्ये एक्सप्रेसवेसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातात ४७,९८४ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत दिली. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. २०१९ मध्ये द्रुतगती मार्गांसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातांमुळे ५३,८७२ लोकांचा मृत्यू झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाहनांची रचना आणि स्थिती, रस्ते अभियांत्रिकी, वेग, मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, मोबाईल फोनचा वापर यामुळे रस्ते अपघातांच्या घटना होतात. रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी रचना, बांधकाम आणि स्वतंत्र रस्ता सुरक्षा तज्ञांचा समावेश करून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.