.... म्हणून अंबानी, अदानी यांची पूजा केली पाहिजे; भाजपा खासदाराचे वक्तव्य
गेल्या तीन वर्षांत सुमारे १० हजार लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या असल्याची माहिती संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली. केंद्र सरकारच्या या उत्तरानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलेच घेरले. दरम्यान, भाजपाच्या एका खासदाराने गुरुवारी राज्यसभेत अंबानी आणि अदानी यांची पूजा करावी असे म्हटले आहे. कारण ते लोकांना नोकऱ्या देत आहेत. भाजपा खासदार के. जे अल्फोन्स यांनी चर्चेत भाग घेत हे वक्तव्य केले आहे.
"तुम्ही माझ्यावर भांडवलदारांचे मुखपत्र असल्याचा आरोप करू शकता. रिलायन्स असो, अंबानी असो, अदानी असो, कोणीही असो, त्यांची पूजा केली पाहिजे. कारण त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात. हे लोक पैसे गुंतवतात, मग ते अंबानी असोत की अदानी, या देशात पैसा कमावणारा प्रत्येक उद्योगपती रोजगार निर्माण करतो. त्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आदर करणे आवश्यक आहे,” असे खासदार अल्फोन्स यांनी म्हटले.