एअर इंडियाने दिला मंत्री-अधिकाऱ्यांना झटका
मुंबई : एअर इंडियाचे नुकतेच खासगीकरण करण्यात आले. टाटा समूहाने सर्वाधिक बोली लावत कर्जात बुडालेल्या एअर इंडियाला गतवैभव मिळवून देण्यासाठी टाटा समूहाने प्रयत्न सुरु केले आहेत. एअर इंडियाने मंत्री आणि अधिकाऱ्यांची उधारीच बंद केली आहे. यापुढे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आता एअर इंडियाने प्रवास करताना क्रेडीट फॅसिलिटी मिळणार नाही. तशा प्रकारचे निवेदन अर्थ मंत्रालयाने जारी केलं असून ज्यात मंत्र्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना एअर इंडियाने हवाई प्रवास करण्यासाठी रोखीने तिकिटे खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
२००९ पासून एअर इंडियाने भारत सरकारचे मंत्री आणि अधिकारी यांना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासासाठी क्रेडीट फॅसिलिटी उपलब्ध करून दिली होती. प्रवासानंतर तिकिटाची रक्कम एअर इंडियाला सरकारकडून काही दिवसांनी अदा केली जात असे. मात्र मागील काही वर्षीत या उधारीचा प्रचंड डोंगर वाढला. ज्यामुळे एअर इंडियाला तोटा देखील झाला होता.
नुकताच एअर इंडियाचा लिलाव करण्यात आला असून टाटा समूहाने एअर इंडियाची १८००० कोटींना खरेदी केली आहे. याबाबत दोन्ही बाजूने कराराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. टाटा समूह सुशासन, शिस्तबद्धता आणि दर्जा यावर चालतो. टाटा समूहाने पूर्ण ताबा मिळवल्यानंतर एअर इंडियाच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.