आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने मोठा अपघात; २ वारकऱ्यांचा मृत्यू, २० जखमी
कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने मोठा अपघात झाला. यात २ वारकऱ्यांचा मृत्यू झालाय, तर जवळपास २० वारकरी जखमी झालेत. ही घटना आज (२७ नोव्हेंबर) सकाळी ७ च्या सुमारास कान्हेफाटा येथे घडली. यानंतर पिकअप चालकाला वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालापूर उंबरी गाव येथून सुमारे दीडशे वारकरी हे आळंदीच्या दिशेने कार्तिकी यात्रेनिमित्त निघाले होते. हरिनामाचा गजर करत वारकरी रस्त्याच्याकडेने पायी जात होते. तेव्हा, जवळवून जाणाऱ्या पिकअप चालकाचा वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि वारकऱ्यांच्या रांगेच्या मधोमध जाऊन काही जणांना धडक दिली. यात २ वारकऱ्यांचा मृत्यू झालाय, तर जवळपास २० वारकरी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पोलिसांनी या प्रकरणी पिकअप चालकाला ताब्यात घेतलं आहे.