top of page
Writer's pictureMahannewsonline

धक्कादायक! बोट उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले

अमरावती: वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे ही घटना घडली. या दुर्घटनेत सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदत व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून आतापर्यंत नावाड्यासह चौघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांना शोध बचाव पथकाने सुरू केला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दरम्यान ही घटना घडल्यामुळे अमरावतीमध्ये शोककळा पसरली आहे.

गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक सोमवारी तेथे पोहचले होते. सोमवारी दशक्रिया विधी आटोपल्यानंतर मंगळावरी सकाळी सर्व जण श्री क्षेत्र झुंज येथे पोहचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा असून पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका बोटीतून महादेव मंदिराकडे जात असताना पर्यटकांची बोट नदीपात्रात उलटली. त्यात कुटुंबातील अकरा जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले. आतापर्यंत चौघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.

झुंज या पर्यटन क्षेत्रावर या महिन्यात हजारो भाविक येत असतात. क्षमतेपेक्षा जास्त लोकं या बोटीमध्ये बसल्यामुळे ती उलटली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



bottom of page