अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला ; समोर आले "हे" कारण...
राज्य सरकारच्या सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीच्या निर्णयाविरोधात १४ फेब्रुवारीपासून उपोषण करणार असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून कळवलं होतं. मात्र, अण्णा हजारेंच्या आंदोलनासंदर्भात राळेगण सिद्धीत आज ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत "अण्णांनी उपोषण करू नये " असा ठराव करण्यात आला. वयाचा विचार करत अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण करू नये, अशी विनंती ग्रामस्थांनी केली. त्यामुळे अण्णांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही मनमानी कशी करू शकता?, असा सवाल करतानाच वाईनही आपली संस्कृती नाही. आपल्या राज्यात दारुची दुकानं कमी आहेत का? तरीही किराणा आणि सुपरमार्केटमध्ये वाईन का ठेवता? तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाधीन करायचं आहे का? त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायचं नाही, असे हताश उद्गार अण्णा हजारे यांनी काढलं आहे. तसेच उद्यापासून होणारे आमरण उपोषण पुढे ढकलल्याचेही त्यांनी जाहीर केलं.