top of page

‘या’ ठिकाणी होणार रणबीर कपूर- आलिया भट्ट यांचा विवाहसोहळा


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबाबत चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. अखेर ही जोडी कधी विवाहबद्ध होणार, याबद्दलची माहिती समोर आली आहे. रणबीर आणि आलिया हे दोघं या एप्रिल महिन्यातच लग्नाच्या बेडीत अडकणार असून लग्नाचं ठिकाणं ठरलं आहे. या लग्नसोहळ्याला जवळचे नातेवाईक आणि जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

एप्रिल महिन्यात जरी रणबीर-आलिया लग्नगाठ बांधणार असल्याचं वृत्त असलं तरी अद्याप त्यांच्या लग्नाची निश्चित तारीख समोर आलेली नाही. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी जेव्हा एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता त्याचवेळी त्यांनी लग्नाचं ठिकाणही ठरवलं होतं.

मुंबईतील कपूर कुटुंबीयांच्या प्रसिद्ध ‘आरके हाऊस’मध्ये हा विवाहसोहळा होणार आहे. लग्नाचं ठिकाण हे रणबीरनं स्वतः ठरवलं आहे. त्याचे आई- वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचं लग्नही २० जानेवारी १९८० रोजी याच आरके हाऊसमध्ये झालं होतं. त्यामुळे हे घर रणबीरसाठी खूप खास आहे आणि म्हणूनच त्यानं आरके हाऊसमध्ये आलियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी रणबीर आणि आलिया हे उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होती.

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नसोहळ्यात पहिल्यांदा रणबीर-आलियाने एकत्र हजेरी लावली होती. तेव्हापासून पुरस्कार सोहळ्यात, पार्ट्यांमध्ये अनेकदा रणबीर-आलियाला एकत्र पाहिलं गेलं. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. रणबीर-आलियाने अनेकदा माध्यमांसमोरही खुलेपणाने एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त केलं आहे. आता ही जोडी लवकरच आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. ही जोडी आता लवकरच मोठ्या पडद्यावरही पहिल्यांदा एकत्र झळकणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा त्यांचा चित्रपट येत्या ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.


bottom of page