बसचा भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू, ४५ जण जखमी
तिरुपतीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या भाकरपेट ( जि. चित्तूर ) येथे काल रात्री बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर ४५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
शनिवारी रात्री अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथून ५२ लोकांना घेऊन एक खाजगी बस तिरुपतीला निघाली होती. तिरुपतीजवळील चित्तूर जिल्ह्यातील भाकरपेट भागात एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली. या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झालाय, तर ४५ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, रात्रीची वेळ असल्यामुळे अंधारात बचावकार्यात अडथळे येत होते.