top of page
Writer's pictureMahannewsonline

कार अपघातात दोन तरुणींचा मृत्यू ; भरधाव कार कम्पाऊंड वॉलमध्ये घुसली

नागपूर : कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात नागपुरातील दोन तरुणींचा मृत्यू झाला. नागपूरमधील अमरावती मार्गावरील भरतनगर परिसरात हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की नियंत्रण सुटल्यानंतर कार एका घराच्या कम्पाऊंड वॉलमध्ये घुसली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. भावना मोहनलाल यादव (१८, सतरंजीपुरा) आणि राशी दीपक यादव (२२, इतवारी) अशी दोन्ही ठार झालेल्या तरुणींची नावे आहेत. कारचालक चिराग राजेश जैन (२१, सतरंजीपुरा) आणि त्याचा मित्र गिरीश लक्ष्मण रामचंदानी (२१) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास वरील चौघे एमएच 31 ईवाय 8899 क्रमांकाच्या बोलेरो कारने वाडी येथील हॉटेलमध्ये जेवायला गेले. जेवण झाल्यानंतर रात्री 10 वाजताच्या सुमारास ते घरी परत जात होते. चिराग कार चालवत होता तर त्याच्या बाजूला गिरीश बसला होता. दोन्ही तरुणी मागील सीटवर बसल्या होत्या. भरतनगर येथील पंजाब नॅशनल बँकेजवळून येत असताना चिरागचा भरधाव कारवरील ताबा सुटला आणि कार फुटपाथवर चढून झाडाला धडकली. कारचा स्पीड जास्त असल्याने झाडाला धडकूनही कार थांबली नाही. त्यानंतर कार बाजूलाच असलेल्या घराच्या कम्पाऊंड वॉलला आदळून उलटली. या घटनेची माहिती मिळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गंभीर अवस्थेत असणाऱ्या दोघींना पोलिसांनी खासगी रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दोन्ही तरूणींना मृत घोषित केले.

अपघातानंतर गिरीश हा घटनास्थळीच जखमी अवस्थेत बसला तर कारचालक चिराग जैन हा पळून गेला. पोलिसांनी त्याचे लोकेशन घेऊन सेंट्रल एव्हेन्यू चौकातून चिरागला ताब्यात घेतले. त्यावेळी तो मद्यधुंद परिस्थितीत असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून चिराग यास अटक केली.


bottom of page