टायर फुटले अन् कार पानशेत धरणात बुडाली; महिलेचा मृत्यू
खडकवासला : अचानक टायर फुटल्याने कार रस्त्याच्या कडेला घसरत जाऊन पानशेत धरणाच्या पाण्यात पडली. या अपघातात कारमधील महिलेचा मृत्यू झाला तर पती आणि मुलगा वाचले आहेत. समृद्धी योगेश देशपांडे (वय ३३) असं अपघातात मृत झालेल्या महिलेच नाव आहे. त्यांचे पती योगेश देशपांडे (वय ३५) आणि मुलगा ( वय ९) हे यातून बचावले आहेत. ही दुर्घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-कुरण-वेल्हे या रस्त्यावरील कादवे या ठिकाणी ही घटना घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , पुण्यातील शनिवार पेठ परिसरात राहणारे देशपांडे कुटुंब पानशेत परिसरात फिरण्यासाठी आले होते. कुरण गावाच्या पुढे आल्यावर एका हॉटेलवर ते थांबले त्यानंतर त्यांनी कार धरणाच्या बाजूला नेली. पाऊस असल्याने ते कारमध्ये बसले होते, कारमध्येच त्यांनी नाश्ता केला. त्यांनतर दुपारी दोन वाजता ते पुढे कादवे गावाच्या दिशेने निघाले असताना अचानक कारचा टायर फुटल्याने योगेश यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला घसरत जाऊन पानशेत धरणाच्या पाण्यात कार पडली. सुरुवातीला काही वेळ कार पाण्यात तरंगत होती. पण नंतर पाणी आतमध्ये शिरल्याने कार पाण्यात बुडाली. यावेळी पुढच्या बाजूच्या दो्नही खिडक्या उघड्या असल्याने योगेश आणि त्यांचा मुलगा हे दोघेही पाण्याबाहेर पडले. पण मागील दरवाजाची काच बंद असल्याने समृद्धी यांना बाहेर पडता आलं नाही.
मोठा आवाज झाल्याने शेजारील हॉटेलमधील वैभव जागडे, अक्षय जागडे, आदित्य लोणारे, तर धरणात मासे पकडणारे नामदेव काटकर हे सर्वजण धावत घटनास्थळी पोहोचले. हॉटेलमधील दोरी घेऊन वैभव जागडे याने पाण्यात उडी मारली. त्याने गाडीच्या टायरला दोरी बांधली आणि ती झाडाला बांधली, त्यामुळे कारने तळ गाठला नाही. त्यांनी समृद्धी यांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही. मागच्या बाजूच्या खिडकीची काच फोडून समृद्धी यांना बाहेर काढून त्यांना तातडीने पानशेत येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच समृद्धी यांचा मृत्यू झाला होता.