बारावीच्या परीक्षाबाबत दोन दिवसांत निर्णय
नवी दिल्ली : सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवरील सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. "केंद्र सरकार दोन दिवसांत परीक्षांबाबत निर्णय घेईल, त्यासाठी सुप्रीम कोर्टानं आम्हाला गुरुवारपर्यंत वेळ द्यावा," अशी विनंती अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयानं ही विनंती मान्य करत सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अॅड. ममता शर्मा यांनी केली होती.
या याचिकेवर आज सुनावणी सुरु झाली. यामध्ये 521 विद्यार्थ्यांच्या वतीनं युथ बार असोसिएशन ऑफ इंडियानंन इंटर्व्हेन्शन याचिका दाखल केली. इंटर्व्हेन्शन याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीनं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा संदर्भ देण्यात आला. 15 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा विद्यार्थ्यांवर वैद्यकीय आपत्ती ओढावणाऱ्या ठरतील. ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेऊ नये, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
केंद्र सरकार दोन दिवसांत परीक्षांबाबत निर्णय घेईल, त्यासाठी सुप्रीम कोर्टानं आम्हाला गुरुवारपर्यंत वेळ द्यावा, अशी विनंती अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयानं ही विनंती मान्य करत सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित केली.