अतिवृष्टीचा फटका; मध्य रेल्वेने ३० गाड्या केल्या रद्द
Updated: Jul 24, 2021
मुंबई: मुंबईसह राज्यभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतुक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी, चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापूर येथे पूरपरिस्थिती उद्भवली आहे. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेसह मध्य रेल्वेला जबरदस्त फटका बसला आहे. प्राप्त परिस्थितीचा आढावा घेता ३० रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. १२ रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. तर ८ रेल्वेगाड्यांची वाहतुक काही काळांसाठी स्थगित करण्यात आली आहे. याबाबत मध्य रेल्वेने ट्विट करत कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्याची माहिती दिली आहे.
चिपळूण ते कामथेदरम्यान रुळावर पाणी येऊन नुकसान झाल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली होती.
दरम्यान, दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातही पावसाने थैमान घातल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसला. दूधसागर परिसराजवळ दोन वेगवेगळ्या भागात दरड कोसळल्याने मुंबई, पुणेसह राज्यातील अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेने २४ ते २८ जुलैपर्यंत अनेक गाड्या रद्द के ल्या आहेत.