top of page
Writer's pictureMahannewsonline

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दुकाने 7 ते 5 पर्यंतच सुरु ठेवण्याचा व्यापाऱ्यांनी घेतला निर्णय

चंद्रपूर : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी आदेशातील निर्बंध शिथील करण्याबाबतचे आदेश जाहीर केले आहे. याअंतर्गत पाच स्तरनिहाय जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश स्तर-1 मध्ये होत असल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक दुकाने दि. 7 जून 2021 पासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

त्यामुळे सोमवारपासून बाजारपेठ आता नियमित वेळेत सुरू होत असल्या तरी कोरोना साखळी तोडण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तिने आपली दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व व्यापारी सदस्यांनी पालन करावे, अशा सूचना निर्गमित केल्या आहेत.

नियमित वेळेत / नियमितपणे या गोष्टी राहतील सुरू :

अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने / आस्थापना, सार्वजनिक स्थळे, खुली मैदाने, चालणे, सायकलींग, सर्व प्रकारची खासगी कार्यालये, क्रीडा, खेळ, चित्रीकरण, सभा / निवडणूक, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांची आमसभा, बांधकाम शेती विषयक कामकाज नियमितपणे सुरू राहतील.

तसेच ई-कॉमर्स, सार्वजनिक क्षेत्रातील बस वाहतुक, माल वाहतूक (जास्तीत जास्त 3 व्यक्ती), आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार, टॅक्सी, बस व ट्रेन) नियमितपणे सुरू राहील. तथापि प्रवासी जर स्तर-5 मधील भागातून येत असेल तर ई-पास आवश्यक राहील. याशिवाय उत्पादन निर्यात प्रदान उद्योग नियमितपणे सुरू राहतील. उत्पादन क्षेत्र, जीवनावश्यक वस्तूची उत्पादन करणारे युनिट ( जीवनावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चामाल उत्पादक पॅकेजिंग व संपूर्ण साखळीतील सेवा) , निरंतर प्रक्रिया उद्योग, राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन, डाटा सेंटर / क्लाऊड सर्विस प्रदाता/ माहिती व तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुंतीचे पायाभूत सेवा ‌व उद्योग, उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा नियमितपणे सुरू राहतील.

50 टक्के क्षमतेने या बाबी राहतील सुरू :

मॉल्स, सिनेमागृह (मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रीन), नाट्यगृहे, रेस्टॉरेंट, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम, लग्न समारंभ (सभागृहाच्या 50 टक्के क्षमतेने तथापि कमाल 100 व्यक्तिंच्या मर्यादेत), व्यायामशाळा, सलून, केस कर्तनालय, ब्यूटी पार्लर / स्पा/ वेलनेस सेंटर (अपॉइंटमेंट घेणे आवश्यक). अंत्यविधी 20 व्यक्तिंच्या मर्यादेत करण्याची मुभा देण्यात आली आहे.


वरील बाबी सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली असली तरी कोरोना विषयक वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक राहील. यात नियमितपणे मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन, आस्थापना / दुकानांच्या प्रवेशद्वाराजवळ ग्राहकांकरिता, प्रवेश करणाऱ्यांना हात धुण्याकरिता साबण किंवा हँड सॅनिटायझर ठेवणे आवश्यक राहील.


सदर नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापना/ दुकाने बंद ठेवण्यात येईल. तसेच यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दंडसुद्धा आकारण्यात येईल. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा संघटनाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.7 जून 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमूद आहे.


bottom of page