“दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री काय कामाचे?”
मागील काही आठवड्यांपूर्वी लसींचा तुटवडा जाणवत आहे. लस पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यानंतर राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून केंद्र-राज्य यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसत आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता काँग्रेसनंही ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्यावरून महाराष्ट्रातील भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत असून, आरोग्य सेवांवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. अचानक झालेल्या रुग्णसंख्येच्या वाढीने बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करू नये म्हणून केंद्राने साठा असलेल्या कंपन्यांवर दबाव आणल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर काँग्रेसनं महाराष्ट्रातील भाजपा आणि एनडीएतील मित्रपक्षाच्या खासदारांवर निशाणा साधला आहे.
“ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ‘ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत’ असं उत्तर देण्यात येतं. रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?,” असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आणि संजय धोत्रे यांचा एक फोटो ट्विट करत “दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे?,” असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.