top of page
Writer's pictureMahannewsonline

राज्यात उद्या रात्रीपासून कडक निर्बंध

राज्यात शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन


राज्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, रूग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण देखील वाढले आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कठोर करण्यात आलेले आहेत, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून येत्या 48 तासांत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्यातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून ही नियमावली लागू होईल. रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी असेल. इतर वेळी जमावबंदी आदेश लागू असतील. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील.


शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कठोर लॉकडाऊन लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय एकमतानं घेण्यात आला आहे. निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांशी, हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, जीम चालक आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांशीही चर्चा केली असल्याचे मलिक यांनी सांगितले.


bottom of page