धक्कादायक : देशात गेल्या १० दिवसांत ३६ हजार ११० जणांचा मृत्यू
भारतात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस उच्चांक गाठत असताना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत असून भारतासाठी हा धोक्याचा इशारा आहे. गुरुवारी देशात ४ लाख १४ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३९२७ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या १० दिवसांमध्ये देशात ३६ हजार ११० जणांचा मृत्यू झाला असून, तासाला सरासरी १५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, याआधी अमेरिकेत १० दिवसांत सर्वाधिक ३४ हजार ७९८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यानंतर ब्राझीलचा क्रमांक होता. ब्राझीलमध्ये ३२ हजार ६९२ मृत्यू झाले होते. पण भारताने अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकलं आहे.
दरम्यान दैनंदिन रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांच्या पुढे गेली आहे. बुधवारी ४ लाख १२ हजार ७८४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर गुरुवारी देशात गेल्या २४ तासांत ४ लाख १४ हजार १८८ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ वर पोहोचली आहे. दरम्यान ३९१५ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतात आतापर्यंत 2 लाख 34 हजार 083 इतक्या जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.