धक्कादायक! शनिवारी लग्न अन् सोमवारी केली आत्महत्या
बीड : दोन दिवसांपूर्वीच (शनिवार, दि. २० ) लग्न झालेल्या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी बीडमध्ये घडली आहे. पांडुरंग डाके असे मयत नवरदेवाचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळले नसून पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अधिक माहिती अशी, बीड जिल्ह्यातील नित्रुड (ता. माजलगाव) येथील रहिवासी पांडुरंग डाके(२६) याचे माजलगाव येथील तरुणाशी लग्न ठरले. शनिवारी मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. नवीन जोडप्याच्या सुखी संसारासाठी सोमवार, दि. २२ रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पूजाही विधीवत आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली. घरात आनंदाचे वातावरण होते. पूजा आटोपल्यानंतर पाहुणे मंडळींची जेवणावळ सुरु होती. बाहेर मंडपात जेवणाच्या पंगती सुरु असतानाच पांडुरंग शेतात गेला आणि तेथे आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
पांडुरंगच्या शेजारी राहणाऱ्या एका शेतकऱ्याने पांडुरंगला शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले पाहिले. त्याने तात्काळ पांडुरंगच्या घरच्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्व नातेवाईक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दरम्या सर्व काही ठीक असताना लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पांडुरंगने अचानक आत्महत्येसारखे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.