उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे आणि ....
उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. . राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे? . महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याची टीका करत राज्यातल्या मंत्र्यांकडे वसुलीची सॉफ्टवेअर असल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस आज नागपूरात माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांच्या भाषणावरुन जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोपही केले. उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. . राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे? शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? त्यामुळे दोष देणं थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार असा सवालही त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले , "मुख्यंमत्री काल म्हणाले की महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. बंगालमध्ये एकही उद्योग टिकत नाही, विरोधात बोलणाऱ्यांना ठार मारलं जातं. मग तीच परिस्थिती त्यांना महाराष्ट्रात निर्माण करायची आहे का? जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊ देणार नाही, महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहणार."
“ईडी, सीबीआय का येत आहे? ती आम्ही आणलेली नाही. ती उच्च न्यायालयाने आणली आणि याचं कारण काय आहे? तर माननीय उद्धवजी, ज्या सरकारचं नेतृत्व तुम्ही करत आहात, ते महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा की इतिहासामध्ये याची नोंद होईल. या सरकारचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे खंडणी वसुली. शेतकऱ्यांना मदत करायला या सरकारजवळ पैसे नसतात. आश्वासने द्यायची आणि सपशेल पाठ दाखवायची आणि केवळ कारणं सांगायची”.
“आयकर विभागाने जे सांगितलं ते ऐकून राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला झोपच यायला नाही पाहिजे की राज्यात अशा प्रकारची, एवढ्या मोठ्या प्रमाणात दलाली चाललेली आहे. दलाली या स्तरावर पोहोचली आहे की आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये असं लक्षात येत आहे की काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलं आहे आणि त्यातून अलर्ट मिळतात की कोणाकडून किती वसुली करायची आहे. हे याठिकाणी जर चालत असेल तर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने ईडी, सीबीआय येणारच आहे. ज्याने काही केलंय त्यालाच यांचं भय असणार आहे”. असं फडणवीस यावेळी म्हणाले.