top of page
Writer's pictureMahannewsonline

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक, विनोदी लेखक, पटकथाकार व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार यांचे आज ( शनिवार ) वृद्धापकाळानं निधन झाले आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ते ९४ वर्षाचे होते.

मिरासदार यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावी १४ एप्रिल १९२७ मध्ये झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूरमधे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.


'बापाची पेंड' या सन १९५७ साली प्रकाशित आलेल्या त्यांच्या पहिल्याच कथासंग्रहाने त्यांना ग्रामीण कथाकार अशी मान्यता मिळवून दिली. या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे हुबेहूब, विरंगुळा, स्पर्श, मिरासदारी आणि अलिकडेच प्रकाशित झालेला भोकरवाडीच्या गोष्टी हे कथासंग्रह लोकप्रिय ठरले. मिरासदार यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण जीवनाचे चित्रण केले आहे.

मिरासदार यांनी ललितलेखनही केले आहे. 'सरमिसळ', 'गप्पांगण' हे त्यांचे ललित लेखसंग्रह देखील गाजले. ललित लेखनासोबतच मिरासदार यांनी एकांकिकाही लिहिल्या. त्यांच्या एकांकिका सुट्टी व पाच एकांकिका या नावाने प्रसिद्ध आहेत. द. मा. मिरासदार यांच्या नावावर तब्बल १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा आहेत. 'एक डाव भुताचा' या चित्रपटात कथा-पटकथा लेखना करतानाच त्यांनी हेडमास्तरची भूमिकाही साकारली होती. 'व्यंकूची शिकवणी', 'माझ्या बापाची पेंड', 'शिवाजीचे हस्ताक्षर', 'भुताचा जन्म', 'माझी पहिली चोरी', 'हरवल्याचा शोध' इत्यादी कथा वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले होते.



‘द. मा. म्हणजे ग्रामीण विनोदाची मिरासदारी’
 मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगत आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची 'मिरासदारी' अबाधित राहील. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वाने निखळ आणि अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, द. मा. म्हणजेच दादासाहेबांनी मराठी साहित्यात आपल्या नावाप्रमाणेच मिरासदारी निर्माण केली. मराठीत ग्रामीण जीवनातील पार, कट्ट्यावरचा आणि अशा अनेक इरसाल नमुन्यांचा विनोदी खजिन्याचा पेटाराच दादासाहेबांनी उघडला. विनोदी लेखन, कथाकथन यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवले. कथाकथनातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेला. तसेच ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही गेले. दादासाहेब उभे राहायचे, खर्जातील आवाजात कथा रंगवून सांगू लागले की त्या गावातले नमुने आरसा दाखवल्याप्रमाणे खळखळून हसू लागायचे. विलक्षण निरीक्षण शक्ती आणि लेखन-सादरीकरणातील निर्भेळपणा यामुळे द. मा. मिरासदार यांनी आपली अशी 'मिरासदारी' निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्याने अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

bottom of page