लोकांना बेड्स मिळत नसताना ...IPL वर एवढा पैसा कसा खर्च करु शकतात?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतामध्ये विदारक परिस्थिती झाली आहे. दिवंसेदिवस वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहून आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा ऑस्ट्रेलियन गोलंदाज अॅण्ड्रयू टाय हा मायदेशी परतला आहे. "भारतामध्ये कोरोना संकट असताना वेगवेगळ्या संघाचे मालक क्रिकेटसाठी एवढा पैसा कसा काय खर्च करु शकतात ? " असा थेट सवाल अॅण्ड्रयूने उपस्थित केला आहे.
एकीकडे देशामधील रुग्णालयांमध्ये लोकांना बेड्स उपलब्ध होत नाहीत आणि दुसरीकडे आयपीएलवर एवढा पैसा खर्च करत आहेत,” असं अॅण्ड्रयूने म्हटलं आहे. मायदेशात परतल्यानंतर त्याने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केलाय. “जर ही स्पर्धा सुरु ठेऊन लोकांचा ताण कमी होत असेल तर ही एक आशेचा किरण आहे. एखाद्या गुहेमधून दूर कुठेतरी टोकाला प्रकाश दिसावा तसा हा प्रकार असल्याचं म्हणता येईल. खरोखरच असं असेल तर ही स्पर्धा सुरु ठेवली पाहिजे,” असंही अॅण्ड्रयूने स्पष्ट केलं आहे.
आयपीएलमधील सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. मात्र हे खेळाडू कधीपर्यंत सुरक्षित राहतील हा प्रश्न मला अनेकदा सतावतो, असंही अॅण्ड्रयूने या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. ३४ वर्षीय अॅण्ड्रयूने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून ऑस्ट्रेलियामध्ये भारतातून येणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंध टाकले जातील अशी शंका उपस्थित करत स्पर्धेतून माघार घेत मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे अॅण्ड्रयूने सांगितलं.