शिक्षण क्षेत्रासाठी भरपूर तरतुदी असलेला अर्थसंकल्प: डॉ. मृणालिनी फडणवीस
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी भरपूर तरतुदी करण्यात आल्या आहेत. उच्च शिक्षणात अधिक गुणवत्ता आणण्यासाठी उच्च शिक्षण आयोग स्थापन केले जाणार आहे, यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. विशेष करून नव्याने अमलात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला हृदयापासून स्वीकारण्यात आले आहे. या अंतर्गत देशात १०० नव्या सैनिकी शाळा उभारल्या जातील. खासगी क्षेत्राचीही यासाठी मदत घेतली जाणार आहे. निश्चितच ही स्वागतार्ह बाब आहे. जम्मू काश्मीरच्या लेह भागात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल, यासाठी वेगळी तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शेती आणि आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा आजच्या अर्थसंकल्पात झाल्या आहेत. यामुळे या दोन्ही क्षेत्रात निश्चितच सुधारणात्मक बदल होईल, अशी अपेक्षा आहे. आरोग्य क्षेत्राला तर नवसंजीवनी या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. सर्व बाबींचा विचार अर्थसंकल्पात झालेला दिसून येत असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, यांनी सांगितले.