top of page

Video: चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांनी केली 15 किलोमीटरची पायपीट

गडचिरोली: वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने आई- वडिलांना आपल्या चिमुकल्या मुलांचे मृतदेह घेऊन 15 किलोमीटरची पायपीट करावी लागली. बुधवार, दि. ४ सप्टेंबर रोजी पत्तीगाव (ता. अहेरी, जि. गडचिरोली) येथे ही घटना घडली आहे.. या घटनेचा व्हिड़ीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे


बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) व दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा, ता. अहेरी) अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे.



दोन दिवसांपूर्वी आई- वडिलांसमवेत ते पत्तीगाव येथे आले होते. ४ सप्टेंबरला बाजीराव आणि दिनेश हे दोघेही आजारी पडले.आई- वडिलांनी त्यांना एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी दिली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर आई वडिलांनी दोन्ही मुलांना जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली. पण वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन पत्तीगावची वाट धरली. नाले, चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहने जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली.

या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे.अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.



bottom of page