गडचिरोली जिल्हयात लॉकडाऊन बाबत काही प्रमाणात शिथिलता
गडचिरोली : जिल्हयात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून निर्बंध लावण्यात आले होते, यामध्ये काही प्रमाणात जिल्हयात शिथिलता देण्यात आली आहे. अर्थचक्राला गती देण्याबरोबरच कोरोना संसर्ग रोखणे अशी दुहेरी जबाबदारी आता आपल्याला पार पाडावी लागेल असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. ते म्हणाले कोरोना संसर्ग संपला असे नाही तज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानूसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी खबरदारी घेत आपल्याला त्यावर मात करायची आहे. दुकाने सुरू करत असताना आता संबंधित मालकांवर अधिक जबाबदारी आली आहे.
अर्थचक्र सुरू ठेवत कोरोना संसर्ग होवू देवू नये यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. कुठेही गर्दी होता कामा नये. दिलेल्या सुचनांचे पालक करून संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. नाहीतर संसर्ग वाढला तर आपणाला पुन्हा सर्व निर्बंध घालावे लागतील असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
ब्रेक द चैन अंतर्गत निर्गमीत केलेल्या नवीन आदेशांमध्ये पुढिल बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
विविध दुकाने आस्थापना सुरू करत असताना वेळांमध्ये बदल करून तो आता सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 असा राहणार आहे.
पुर्वी प्रमाणे आत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 सुरू राहतील.
तथापि इतर प्रकारच्या दुकानांमध्ये गर्दी टाळण्यासाठी दोन भागात सुरू करण्यात आले आहेत.
यात मंगळवार व गुरूवार कपडे, चप्पल, सौंदर्य प्रसाधने, जनरल स्टोअर्स व लहान मुलांची खेळण्याची दुकाने सुरू असतील, तर
बुधवार व शुक्रवार वरील उल्लेख केलेली दुकाने बंद राहतील व इतर दुकाने सुरू असतील
यामध्ये आपण काही बाबींना अजूनही प्रतिबंधीत ठेवत आहोत
यात सलून, ब्युटी पार्लर, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, क्रीडा संकूल बंदच राहतील
पार्क, गार्डन, उद्याने व सिनेमागृह बंदच राहतील, पानटपरी/पानठेले, आठवडी बाजार, गुजरी बंदच असेल
हॉटेल, उपहारगृह, खानावळही बंदच राहिल मात्र पार्सल व घरपोच सुविधा सुरू राहील.
धार्मिक स्थळे बंदच असतील
कृषीविषयक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत सुरू राहतील
शुक्रवार दुपारी 2.00 वाजलेपासून मंगळवारी सकाळी 7.00 वाजेपर्यंत आत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून सर्व बंद राहतील.
ई कॉमर्स सेवा सुरू सुरू करण्यात येत असून घरपोच सेवा देणेस मुभा असेल.
ब्रेक द चैन अंतर्गत अर्थचक्राला गती देण्यासाठी निर्बंध कमी करत असताना मुख्यत: दुकानदारांची जबाबदारी जास्त आहे. दुकान असोशिएशनने कोरोना संसर्गाबाबत सर्व खबरदारींचे पालन करणार असल्याचे मान्य केले आहे. तोंडाला मास्क लावणे, शाररिक अंतर पाळणे तसेच दुकानांमध्ये ५ पेक्षा जास्त गर्दी होवू देवू नये यासाठी लोकांबरोबर दुकानदारांनी प्रयत्न केलेच पाहिजेत.