top of page
Writer's pictureMahannewsonline

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता तरी भ्रमात राहू नये...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आल्यानंतर भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपाला सहज हरवता येईल असा भ्रम महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला झाला होता. हा भ्रमाचा भोपळा पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील जनतेनी फोडला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता तरी भ्रमात राहू नये.

स्व. भारतनाना भालके यांचा या मतदारसंघात मोठा सलोखा होता. प्रत्येक घरात त्यांचा संपर्क होता. ही निवडणूक भावनिक होती. तरीही अशा स्थितीतही मतदारांनी भाजपला निवडून दिले. त्याबद्दल मतदारांचे आभार. सर्वसामान्य लोकांशी भाजपाची नाळ जोडलेली आहे. सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम भाजपाकडून वेळोवेळी होत आहे. उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आणि बडे नेते या मतदारसंघात तळ ठोकून होते. भावनिक विषय बाजूला ठेवून सुज्ञ मतदारांनी विकासाला अर्थातच भाजपाला निवडून दिले. अशी प्रतिक्रिया आ. गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक निकालानंतर दिली.

तत्पूर्वी आज दुपारी आ. पडळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून राष्ट्रवादीवर निशाणा साधला. “पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन. जय मल्हार”, अशी पोस्ट गोपीचंद पडळकर यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी 11 एप्रिलला पावसात सभा घेतली होती. त्या सभेवरुन पडळकरांनी हे टीकास्त्र सोडलं.



bottom of page