top of page
Writer's pictureMahannewsonline

माझ्यावर हल्ला करण्याच्या कटामध्ये जयंत पाटील यांचा सहभाग; गोपीचंद पडळकरांचा आरोप

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पडळकर यांनी व्हिडिओ ट्विट करत माझ्यावर हल्ला करण्यामध्ये जयंत पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप केला. आटपाडी पोलीस स्टेशनच्या जवळून जात असताना माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.' जिंदगी तो अपने दम पर ही जी जाती है..दुसरो के कन्धों पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते हे...' असं म्हणत पडळकर यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

“७ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्यावर हल्ला करण्यात आला. आटपाडी पोलीस स्टेशनच्या समोर हा हल्ला झाला. हा हल्ला सुनियोजितपणे करण्यात आला होता. माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवरती दगडं फेकायची मग माझ्या गाडीची स्पीड कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा आणि मग जमावाकडनं हल्ला करून घ्यायचा असा सुनियोजित हा कट आखला होता,” असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

“आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना पाहायला मिळत आहे. हा सगळा कट पोलीसांच्या संरक्षणात घडवून आणला गेला आणि सदर घटना थांबविण्यापेक्षा चित्रिकरणात मग्न होते. या हल्ल्याच्या कटात जिल्हायाचे पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत. यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच निलंबित केलं आणि उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला,” असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

“पोलीस अधिक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळे मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षकात सामील झाले असतील तर नेमका विश्वास ठेवायचा कुणावरती?” असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.


bottom of page