राज्यातील बारावीच्या परीक्षा अखेर रद्द!
पुणे : सीबीएसईने (CBSE) बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या जवळपास १४ लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कालच बारावी परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचं सांगितलं होतं. आज ( गुरुवारी) झालेल्या बैठकीत शिक्षण विभागाचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने यास मंजूरी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
बुधवारी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला याबाबतची फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची यासंदर्भात बैठक होईल. त्यात ते या फाईलवर निर्णय घेतील असं सांगितले. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे, असंही त्यांनी सांगतिले होते.