top of page
Writer's pictureMahannewsonline

बारावीच्या परीक्षा अखेर रद्द!; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारनं दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. या पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान, परीक्षा होणार नसल्यामुळे आता १२वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण होणार असून त्यासंदर्भात सीबीएसई निश्चित अशा मानकांच्या आधारे नियोजित वेळ ठरवून त्यानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करेल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं मोदी म्हणाले.

देशातील कोरोना रुग्णसंख्या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. ममता शर्मा यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांच्या याचिकेवर हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये सीबीएसई बोर्डाला आणि पर्यायाने केंद्र सरकारला यासंदर्भात निश्चित असा निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्ट या संदर्भात गुरुवारी म्हणजे 3 जून रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागून घेतला होता. त्यापूर्वीचं मोदी सरकारनं सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


bottom of page