T20 विश्वचषक: भारताचा स्कॉटलंडवर सहज विजय!; उपांत्य फेरीत पोहचण्याची आशा कायम
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारताने आज स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात स्कॉटलंडवर ८ गड्यांनी सहज विजय मिळविला. रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता सर्वांचे लक्ष न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्याकडे लागले आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला तर भारताचा उपांत्य फेरीत पोहचण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मैदानावर जास्त काळ टिकू दिले नाही. स्कॉटलंडने १७.४ षटकात ८५ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर बुमराहला २ बळी घेता आले. विजयासाठी ८६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली.सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली. पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. त्याने 16 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 30 धावा केल्या.तर लोकेश राहुलने १९ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारासह 50 धावा केल्या. सूर्यकुमारने षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. सेमी फायनलमधील आशा पल्लवित ठेवण्यासाठी स्कॉटलंडने दिलेले आव्हान ४३ चेंडूत पार करायचे होते. मात्र भारताने अवघ्या ६.३ षटकात ८ गड्यानी हा सामना सहज जिंकला.