कोरोना संशोधन गटाचे प्रमुख शाहिद जमील यांचा तडकाफडकी राजीनामा
सरकारी धोरणांविषयी व्यक्त केलेली नाराजी
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही-२ जीनोमीक कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी) प्रमुख पदाचा प्रसिद्ध शास्त्रज्ञ शाहीद जामील यांनी राजीनामा दिला आहे. देशामध्ये कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आढळून आल्यानंतर जानेवारीमध्ये आयएसएसीओजीची स्थापना करण्यात आलेली. विषाणूमध्ये होणारा बदल आणि त्यासंदर्भातील सल्ला केंद्राला देण्यासाठी वैज्ञानिकांच्या या गटाची स्थापना करण्यात आली होती. जामील हे या गटाचे प्रमुख होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी हे पद सोडत असल्याचं जाहीर केलं. जामील यांनी अशाप्रकार तडकाफडकी राजीनामा देणं हा सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. डॉ. शाहिद जमील यांनी अध्यक्षपद का सोडलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
जामील हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ असून ते या कोरोनाच्या साथीसंदर्भात मुक्तपणे आपली मतं मांडत असतात. त्यांचे लेख काही दैनिकातही प्रसिद्ध झाले आहेत. अनेक विषयांवरुन जामील यांची मत ही सरकारच्या सध्याच्या धोरणांपेक्षा वेगळी होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात, कमी करण्यात केंद्र सरकार कमी पडल्याची टीका जामील यांनी अनेकदा केली आहे.
न्यूयॉर्क टाइम्समधील एक लेखात त्यांनी सरकारच्या तयारीवर टीका करत वैज्ञानिकांचा सल्ला ऐकत नसल्याचा आरोप केला होता.मोदी सरकारने वैज्ञानिकाचं म्हणणं ऐकावं आणि धोरण बनवण्यासाठी हट्टी वृत्ती सोडावी, असा सल्ला या लेखात शाहिद जमील यांनी दिला होता.