कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. चिपळून ते कामठे स्टेशन दरम्यान असलेल्या रुळांवर पाणी आल्यानंतर कोकण रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कोकण रेल्वेची वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती कोकण रेल्वे कडून देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड आणि विदर्भातील काही ठिकाणीही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.