कोल्हापूरला पुराचा धोका कायम!; 'राधानगरी'चे ५ दरवाजे उघडले
कोल्हापूर : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने उघडीप घेतल्याने सर्वांना दिलासा मिळाला असतानाच रविवारी सायंकाळपासून पावसाची पुन्हा रिपरिप सुरु झाली. अद्यापही पंचगंगा नदीचे पाणी धोका पातळीवरून वाहत आहे. अशातच राधानगरी धरणाचे स्वयंचलित पाच दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्याला पुराचा धोका अद्यापही कायम आहे.
जिल्ह्यात दोन दिवसापासून पाऊस थांबला असला तरीही धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरण सायंकाळी शंभर टक्के भरले. ४ वाजता धरणाचे दोन, ७ वाजता आणखी दोन आणि त्यानंतर पुन्हा एक असे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले. यातून एकूण ७११२ क्यूसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे. नदीची पूर पाणीपातळी कमी होऊ लागले असली तरी अद्याप धोका पूर्णपणे टळलेला नाही.. त्यामुळे लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आले.. पुणे ते बंगळूरू महामार्गावर पाणी कायम असल्याने सुरक्षितेसाठी वाहतुकीसाठी तो रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, पूरग्रस्तांना वेळेत चहा, नाश्ता, जेवण मिळतेय का, आरोग्य सुविधा दिली जातेय का, जनावरांना चारा दिला जातोय का, पशू वैद्यकीय सेवा दिली जातेय का? आदी विविध बाबींवर पुरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा पालकमंत्री पाटील यांनी जाणून घेतल्या. पूर ओसरल्यावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले