top of page
Writer's pictureMahannewsonline

नरबळी नव्हे तर जन्मदात्यानेच केली हत्या...

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सहा वर्षीय आरव राकेश केसरे (वय ६) याच्या खुनाचे रहस्य उलगडले असून हा खून नरबळी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कौटुंबिक वादातून जन्मदात्यानेच मुलाची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आज आरवचे वडील राकेश रंगराव केसरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आरव रविवारी (ता. ३) सायंकाळी गल्लीत खेळत असतानाच बेपत्ता झाला होता. त्याचे अज्ञातांनी अपहरण केल्याची तक्रार वडील राकेश केसरे याने पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांसह ग्रामस्थांनी घातपाताचा संशय घेत गावानजीकचा संपूर्ण परिसर पिंजून काढत आरवचा दोन दिवस शोध घेतला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. मात्र , मंगळवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी पहाटे आरवचा मृतदेह त्याच्याच घराजवळ आढळून आला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेहावर गुलाल आणि कुंकू टाकले. त्यामुळें नरबळी गेला असल्याची चर्चा सर्वत्र होती.

राकेश केसरे व त्यांची पत्नी यांच्यात वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांना आला होता. पोलिसांनी राकेश याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बुधवारी उशिरा खूनाची कबुली दिली. पत्नीशी झालेल्या भांडणाचा राग डोक्यात धरून राकेश याने मुलगा आरवच्या छातीवर मारून आणि नंतर गळा दाबून खून केला.. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेहावर गुलाल आणि कुंकू टाकले. या सर्व प्रकाराची कबुली राकेशने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.


bottom of page