top of page
Writer's pictureMahannewsonline

कंटेनरनं चिरडल्यानं आजीसह नातवाचा मृत्यू

आईचा देखील कंटेनरखाली चिरडून झाला होता मृत्यू

लातूर: जिल्ह्यातील अहमदपूर येथे सोमवारी सकाळी स्कुटीवरून जाणाऱ्या आजी आणि नातवाला कंटेनरनं चिरडल्यानं दोघांचाही अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी आजी आणि नातवाचा देखील त्याचप्रमाणे मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोमवारी सकाळी २५ वर्षीय योगेश जयराज गोरे आपली ८० वर्षीय आजी कमलबाई शिवराज गोरे यांना स्कुटीवर घेऊन कामानिमित्त बाहेर गेला होता. दरम्यान, अहमदापुरातील थोडगा रस्त्यावरून जात असताना, समोरून आलेल्या अवजड कंटेनरनं स्कूटीला जोरदार घडक दिली. दोघांना कंटेनरनं चिरडल्यानं दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

मृत योगेश यानं पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्युटमधून शिक्षण घेतलं होतं. अलीकडेच २०२० मध्ये त्यानं पदवी प्राप्त केली होती. तो सध्या नोकरीच्या शोधात होता. तसेच पुण्यात कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे तो आपल्या गावी परत आला होता. दरम्यान हा अपघात झाल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत योगेशच्या आईचा देखील अशाच प्रकारे मृत्यू झाला होता.

आईचा देखील कंटेनरखाली चिरडून झाला होता मृत्यू

२०१४ साली काही कामानिमित्त योगेशची आई स्कुटीवरून घराबाहेर गेली होती. दरम्यान एका कंटेनरनं त्यांना जोरदार टक्कर मारली होती. त्या अपघातत योगेशच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती काल घडली आहे. ज्यामध्ये योगेश आणि त्याच्या आजीचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या घटनेत तिघांचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


bottom of page