सेल्फी काढताना वीज कोसळली; ११ जणांचा मृत्यू
जयपूर : जयपूरजवळ असलेल्या आमेर पॅलेस येथे वीज कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर ३५ जण जखमी झाले असल्याची माहित समोर आली आहे. रविवारी सायंकाळी आमेर पॅलेस येथील वॉच टॉवरवर वीज पडल्याची घटना घडली. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि एसडीआरएफची टीम बचाव घटनास्थळी पोहोचली. बचाव पथकाने ३५ हून अधिक जणांना खाली आणले आहे, परंतु अजूनही काहीजण डोंगरावर अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने राजस्थानची राजधानी जयपूर येथील आमेर महल परिसरात पर्यंटकांनी गर्दी केली होती. सर्व पर्यटक फोटो आणि सेल्फी घेत होते. त्याच दरम्यान वॉच टॉवरवर वीज कोसळली. वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. काही जणांनी घाबरुन वॉच टॉवरवरून उडी मारल्याने त्यांच्यातील अनेक जखमी झाले. ही घटना घडली तेव्हा वॉच टॉवर आणि किल्ल्याच्या भिंतीवर अनेक पर्यटक असल्याची माहिती आहे.
आमेर पॅलेसच्या घटनेव्यतिरिक्त, रविवारी राज्यभरात वीज कोसळल्याने आणखी नऊ जणांचा बळी गेला. बरण आणि झालावाडमध्ये प्रत्येकी एक, कोटामध्ये चार आणि धौलपूर जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये रविवारी अनेक ठिकाणी पाऊस पडला.
दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींनाही मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.