राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला
राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आधी हे निर्बंध १ मेपर्यंत होते व नंतर १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत शनिवारी संपत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. त्यांनतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (बुधवार) प्रसारमाध्यमांशी बोलताना लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याचे सांगितले होते व तसेच तो निर्णय मुख्यमंत्री अधिकृत जाहीर करतील अशी माहिती दिली होती. त्यानुसार आत १ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश आज प्रसिद्ध करण्यात आला असून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानेच सध्या लागू असलेले कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. दुसऱ्या राज्यातील नागरिकांना महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांना आरटीपीआसीरआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे निगेटिव्ह आरटीपीआसीरआर टेस्ट रिपोर्ट असं बंधनकारक असून प्रवेश कऱण्याच्या ४८ तास आधी हा रिपोर्ट काढलेला असावा असं आदेशात नमूद आहे. दरम्यान देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असतील. एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी असं सागंण्यात आलं आहे.
१४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे राज्यातील रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. १० ते १५ जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा कमी झाला असला तरी अजूनही काही जिल्हयात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्याचे निर्बध आणखी १५ दिवस वाढविण्याची एकमुखी मागणी बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यानुसार लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.