मिल्खा सिंग यांचे निधन
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकवून देणारे धावपटू मिल्खा सिंग यांचे आज निधन झाले आहे..ते ९१ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसाठी हा दुसरा धक्का आहे.
गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली. त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये दाखल केले गेले. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मिल्खा सिंग यांचा अल्प परिचय
मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मिल्खा सिंग यांचा विक्रम ५० वर्षांहून अधिक काळ कायम राहिला होता. २०१० दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कृष्णा पूनियाने डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण जिंकून हा विक्रम मोडित काढला.