राज्यांनी लॉकडाऊनकडे अंतिम पर्याय म्हणूनच पाहावं!
देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यापाठोपाठ मृत्यूच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी देशवासीयांशी संवाद साधला. आजच्या स्थितीत आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. राज्यांनी देखील लॉकडाऊनला अंतिम पर्याय म्हणून पाहावं. लॉकडाऊनपासून वाचण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण अर्थव्यवस्थेसोबतच देशवासीयांच्या आरोग्याची देखील काळजी घेऊया”, असं मोदी यावेळी म्हणाले.
सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक करतो. तुम्ही करोनाच्या पहिल्या लाटेत देखील आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं होतं. आज तुम्ही पुन्हा या संकटात दिवस-रात्र मेहनत घेत आहात. कठिणात कठीण परिस्थितीत आपण धीर सोडता कामा नये. आपण योग्य दिशेने निर्णय घेतला तरच आपल्याला विजय मिळू शकेल, असं मोदी यावेळी म्हणाले.यावेळी देशातील नागरिकांना धीर देतानाच कोरोनासाठी देश पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.
कोरोना काळात देशाच्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. या बाबतीत पूर्ण संवेदनशीलतेने काम केलं जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार या सगळ्यांचे प्रयत्न आहेत की प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा. ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत”, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
कोरोनाचे रुग्ण वाढताच देशातील औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांची निर्मिती वाढवली आहे. त्याचा वेग अजून वाढवला जात आहे. आज देशातली सगळ्यात स्वस्त व्हॅक्सिन भारतात आहे. यामध्ये देशातील संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा आणि मदत वाढवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं दोन भारतीय लसींच्या मदतीने जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाला सुरूवात केली. यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रातल्या गरजू लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले गेले, असंही ते म्हणाले.
१८ वर्षांवरील लोकांना लस उपलब्ध झाल्यामुळे श्रमिकांना लस उपलब्ध होऊ शकेल. राज्य सरकारांनी मजुरांना विश्वास द्यावा की ते जिथे आहेत, तिथेच त्यांनी थांबावं. गेल्या वेळची परिस्थिती आत्तापेक्षा फार वेगळी होती. तेव्हा आपल्याकडे या संकटाशी लढण्यासाठी उपाय नव्हता. देशानं करोनाविरोधात आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने लढा दिला आहे. त्याचं श्रेय तुम्हा सगळ्यांना जातं.
गेल्या वेळेपेक्षा यावेळची स्थिती खूप वेगळी आहे. तेव्हा आपल्याकडे पुरेशा पायाभूत सुविधा नव्हत्या. कोरोना टेस्टसाठी लॅब नव्हत्या. पीपीई किट नव्हते. पण आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पीपी किट्स, लॅब्स आणि क्षमता आहे. प्रसार माध्यमांनी नागरिकांना जागरूक करावं
.
या संकटकाळात अधिकाधिक लोकांनी पुढे यावं आणि देशवासीयांना मदत करावी. युवकांनी आपल्या सोसायटीमध्ये, परिसरात छोट्या छोट्या समित्या तयार करून कोरोना नियमांचं पालन करण्यासाठी मदत करावी. असं केलं, तर सरकारांना कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्याची गरजच पडणार नाही.