मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या दुसऱ्या दिवशी अटक वॉरंट ...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का देत कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला. मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मौर्य यांच्या विरोधात धार्मिक भावना भडविण्याच्या प्रकरणात अटक वाॅरंट निघालं आहे. मौर्य यांनी बसपामध्ये असताना देवी-देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणावर २४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. कोर्टाने २४ जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.
दरम्यान, मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना स्वामी प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, माझे व्यक्तिगत कोणीशीही शत्रुत्व नाही. सामाजिक न्यायासाठी मी सातत्याने संघर्ष केला आहे. यापुढेही करत राहणार आहे. सध्या तरी उत्तर प्रदेशमध्ये सामाजिक न्याय मिळताना दिसत नाही. त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे आमदार रोशन लल, भगवती सागर आणि बृजेश प्रजापति यांनीही राजीनामा दिला आहे.