top of page

१५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला...; बोहल्यावर चढण्याआधीच होणाऱ्या बायकोचा केला खून

पंधरा दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणाने, बोहल्यावर चढण्याआधीच आपल्या होणाऱ्या बायकोचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालन्यातील मंठा तालुक्यातील बेलोरा तांड्यावर ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या करणारा तरुण फरार झाला आहे. , मयत सपना ऊर्फ दीप्ती संदीप जाधव असे मयत तरुणीचे नाव आहे. तर सुशील पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंठा तालुक्यातील बेलोरा तांडा येथील सपना संदीप जाधव (वय १७) हीचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरूड येथील सुशील पवार या तरुणासोबत ठरला होता. १५ दिवसांपूर्वीच सपना आणि सुशील दोघांचा साखरपुडा झाला. दरम्यान दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी ठरवल्याप्रमाणे शनिवारी मुलाकडील आणि मुलीकडील मंडळी लोणार येथे बस्ता बांधण्यासाठी गेले होते. यावेळी सुशील देखील बस्ता खरेदी करण्यासाठी गेला होता.

मुलाकडील आणि मुलीकडील मंडळी बस्ता खरेदी करत असतानाच, सुशील तेथून थेट बेलोरा तांडा येथे गेला. यावेळी सपना घरी एकटीच होती. घरी गेल्यावर त्याने सपनावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि दोघांमध्ये वादावादी झाली. त्यातूनच त्याने सोबत आणलेल्या चाकूने गळा चिरून सपनाची हत्या केली. घरात असलेल्या लहान मुलांनी याबाबत तत्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. त्यामुळे गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सपना रक्ताच्या थोरळ्यात पडलेली होती. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन गावकऱ्यांनी बस्ता बांधण्यासाठी गेलेल्या दोन्हीकडच्या मंडळींना तात्काळ बोलावून घेतलं. तर गावात आलेल्या वराकडील मंडळींना एका घरात सुरक्षित कोंडून ठेवलं. त्यामुळे पोलीस येईपर्यंत ते सुरक्षित राहिले. अन्यथा रागाच्या भरात वधुकडील मंडळींकडून अनुचित प्रकार घडला असता.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मुलीकडील नातेवाइकांनी मृतदेह थेट सेवली पोलीस ठाण्यात आणला. जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह उचलला, अशी माहिती पोलिसांनी दिली.


bottom of page