top of page

राजापूरसह ४१ अवर्षणप्रवण गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार

जलजीवन मिशन अंतर्गत राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी

नाशिक – जलजीवन मिशन अंतर्गत येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी 162 कोटी निधी मंजूर झाला असून, या योजनेस प्रशासकीय मान्यताही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यातून प्राप्त झाली आहे. आज राजापूरसह 41 अवर्षणप्रवण व दुष्काळी गावांचा कायमस्वरूपी सुटणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

येवला तालुक्यातील पन्हाळसाठे व पिंपळखुटे 3 रे येथे जलजीवन मिशन अंतर्गत 41 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनसेसाठी असलेल्या जागेची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवडे, कार्यकारी अभियंता सुबोध मोरे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी,अंबादास बनकर,वसंत पवार, राधाकिसन सोनवणे,मोहन शेलार,सचिन कळमकर, तहसलिदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख,सरपंच धनराज पालवे,नगरसुलच्या सरपंच मंदाकिनी पाटील,प्रा ज्ञानेश्वर दराडे, परशराम दराडे, बाळासाहेब दाणे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, 2012 साली या योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. आज हे स्वप्न साकार झाल्याने मनस्वी समाधान लाभले आहे. या योजनेसाठी 3.5 एकर जागेची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या सहकार्यातून आवश्यक भूमीसंपादन प्रक्रिया रितसरपणे पार पाडली जाणार आहे. अतिरिक्त निधी जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, जागेसाठी स्थानिक पातळीवर ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. परस्पर समन्वयातून या कामाला गती मिळणार आहे. तत्पुर्वी येत्या महिन्याभरातच पाणी आरक्षणाची पूर्तता करण्यात येणार आहे. एकसंघ भावनेतून काम करून येत्या दोन वर्षातच सदर योजनेचे काम पूर्णत्वास येईल यात शंका नाही असा विश्वास पालमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी, रहाडी, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळमखुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, घुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, अडसुरेगाव, धामणगाव, लहीत, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, भायखेडा, कोळमबुर्द, कोळगाव, कुसमाडी, नायगव्हाण, खिर्डीसाठे, महालगाव, गणेशापूर, कासारखेडे, दुगलगाव व बोकटे या 41 अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांना या योजनेच्या लाभ मिळणार असून पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याने यावेळी या गावांतील उपस्थित सरपंच व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

अद्ययावत सेवा व सुविधायुक्त ग्रामसचिवालय साकारण्याचा मानस अद्ययावत सेवा व सुविधा असलेले ग्रामसचिवालयाचे कार्यालय नगरसुल येथे साकारण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज येवला तालुक्यातील प्रस्तावित कामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, अद्यावत ग्रामसचिवालय ही एक आदर्श इमारत असणार आहे. येथे नागरिकांना सर्व उत्तम सेवा व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. नगरसुल भागातील वीज गैरसोय टाळण्यसाठी ५एमव्हिए चे अतिरिक्त रोहित्र बसविले जाणार आहे. ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत पुणेगाव दरसवाडी कालव्याचे अस्तरीकरणासाठी 1400 कोटींचा प्रस्ताव प्रस्तावित असून, अस्तरीकरण झाल्यानंतर पाणी गळतीचा प्रश्न दूर होऊन भविष्यात पाणी वेगाने पुढे येण्यासाठी व्यवस्था केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

येवला तालुक्यातील नगरसूल येथील या कामांचे भूमिपूजन… स्थानिक विकास निधी व जनसुविधा अंतर्गत ग्रामसचिवालय बांधकामाचे भूमिपूजन (रु. 40.00 लक्ष) तलाठी कार्यालय-निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन (रु.३० लक्ष) आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले.


bottom of page