गडचिरोलीत चकमक; १३ नक्षलवादी ठार
गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १३ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.. एटापल्ली तालुक्यातील पैदी-कोटमी येथील जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटकडूनही कारवाई करण्यात आली आहे.
सकाळपासून नक्षलवाद्यांविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना दरम्यान पोलिसांची तुकडी नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असणाऱ्या ठिकाणी पोहचली. पोलिसांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत १३ नक्सल ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापही या भागात शोधमोहिम सुरु आहे. हा संपूर्ण परिसर छत्तीसगढच्या सीमेजवळ असून या भागात नक्षलवाद्यांचा वावर असतो. काही दिवसांपूर्वीच येथील पोलीस चौकीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. .