top of page
Writer's pictureMahannewsonline

निवडणुकीला उभे राहा म्हणून आम्ही गुळ, खोबरं दिलं होतं का?....

नाना पाटेकरांनी मांडलं स्पष्ट मत


आम्ही तुम्हाला निवडून देतो म्हणजे पाच वर्ष तुम्ही आमच्या गोष्टी केल्याच पाहिजेत... निवडणुकीला उभे राहा म्हणून आम्ही गुळ, खोबरं दिलं होतं का? आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे म्हटल्यावर तुमची जबाबदारी आहे. .... सातबाऱ्यावर जमिनी नाही, तर माणसं वाढली पाहिजेत... ,”  - नाना पाटेकर 

शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यातील बाणेर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं शनिवारी लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजपा नेते गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अभिनेते नाना पाटेकरदेखील उपस्थित होते.


यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, “नाम संस्थेची स्थापना झाली तेव्हा कोणावरही टीका करण्याचं मी टाळतो. वैयक्तिक भेट झाल्यावर आवडलं नाही असं सांगतो. कारण ‘नाम’च्या माध्यमातून करता आलं तेवढं काम मला आयुष्यात कधीच करता आलं नाही. जवळजवळ ५० वर्षांपासून मी चित्रपट, नाट्यसृष्टीत आहे पण गेल्या ७-८ वर्षात ‘नाम’च्या माध्यमातून काम करताना नट म्हणून जे सन्मान मिळाले त्यापेक्षा ‘नाम’च्या कामातून मिळालेलं समाधान हे जास्त मोठं आहे. त्यामुळे मी कोणावरही जाहीर टीका करत नाही,” असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले.


“महाराजांचे पुतळे उभारणं सोपं आहे. त्यांची विचारसरणी, विचारांचं अनुकरण करण्यासाठी एक पाऊल जरी टाकता आलं तरी फार महत्वाचं आहे. जय भवानी, जय शिवाजी बोलणं खूप सोपं आहे. महाराजांनी सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केलं. प्रत्येकाला सामावून घेण्याची त्यांची ताकद होती. योग्यतेपेक्षा फार मोठं त्यांनी प्रत्येकाच्या पदरात टाकलं,” असं नाना पाटेकर म्हणाले.


पुढे बोलताना त्यांनी आपण सर्व दैवतं वाटून घेतल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, “आपण सर्वांनी दैवतं वाटून घेतल्याचं फार वाईट वाटतं. महाराज, आंबेडकर, टिळक माझेच आहेत. इतिहासाचा चांगला भाग घ्यावा आणि बाकीचा आहे तो काढून टाका. ब्राह्मण, ब्राह्मणेतर हा वाद आता नको आता . माणूस म्हणून एकमेकांना ओळखू लागू तेव्हाच खऱ्या अर्थाने या स्मारकाचा सन्मान कराल. येता जाता रस्त्यात कुठलाही पुतळा उभा आहे असं नाही. ते महाराज आहेत. महाराजांचा पुतळा कुठे उभा करायचा हे कळायला पाहिजे. त्याच्यावरुन वाद का होतात, कशासाठी होतात हे मला कळत नाही. हा आपला इतिहास आहे”.

“प्रार्थना म्हणतो तेव्हा कोणताही मोबदला नसतो.त्यातून समाधान मिळतं, हे स्मारक आपली प्रार्थना आहे. ही तुमच्या समाधानासाठी आहे. त्यांचे विचार तुम्ही घेतले पाहिजे. त्याचा अर्थ आहे. नाही तर इतर पुतळ्यांप्रमाणे हादेखील एक पुतळा होईल. यावरुन सलोखा वाढला पाहिजे, भांडणं नाही,” असं नाना पाटेकर म्हणाले.


“काही तथाकथित विद्वान आणि काही राजकारणी मंडळींनी महाराजांचा इतिहास त्यांच्या स्वार्थासाठी वेगवेगळा मांडला आहे. आपण सर्वजण शिक्षित असून त्याची नेमकी माहिती असली पाहिजे,” असं नाना पाटेकर यांनी सांगितलं. आपल्या हातून समाजपयोगी गोष्टी झाल्या पाहिजेत, नुसते पुतळे उभारणं नाही असंही स्पष्ट मत यावेळी त्यांनी मांडलं.


“अन्न, वस्त्र, निवारा मिळेल तेव्हा विचार प्रत्येकजण विचार करु लागेल आणि तेव्हा कोणाला मत द्यायचं हे कळेल. मी कोणत्याही प्रकारचा दागिना अंगावर घालत नाही कारण मी तुमच्यातील एक आहे. आपण एखाद्याच्या भूमिकेतून जातो तेव्हा त्या वेदना वैगेरे कळण्यास मदत होते,” असं नानांनी यावेळी सांगितलं.

“निवडून देतो म्हणजे पाच वर्ष तुम्ही माझ्या गोष्टी केल्याच पाहिजेत. तुमचे कपडे मळलेले पाहिजेत. तुमच्या कपड्याला घामाचा घाण वास आला पाहिजे. हातात भाकरीचा तुकडा ठेवला तर तो गिळायची सवय पाहिजे. निवडणुकीला उभे राहा म्हणून आम्ही गुळ, खोबरं दिलं होतं का? आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे म्हटल्यावर तुमची जबाबदारी आहे. तुम्ही फकीर असं पाहिजे. आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं,” असं नाना पाटेकरांनी यावेळी मंचावर उपस्थित नेत्यांना सांगितलं. सातबाऱ्यावर जमिनी नाही, तर माणसं वाढली पाहिजेत असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.


“आम्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी अशा दोघांनाही मतं दिलेली असतात. त्यामुळे दोघांची जबाबदारी असून मत दिलं असल्याने आम्हाला बोलण्याचा हक्क आहे. आम्हाला फक्त एक दिवस नाही तर रोज हक्क असून आमच्या हिताची कामं करण्यासाठीच तुम्हाला निवडून दिलं आहे. सरकार कोणतंही असो त्याच्याशी काही देणंघेणं नाही. इतकी वर्ष तुम्ही निवडून येत आहात त्यासाठी काही तरी कारण असेलच ना. मी काही भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसचा नाही. तुम्ही केलंच पाहिजे, आणि ते नाही केलं तर मी धरणार. तो आम्हा जनतेचा हक्कच आहे. आमच्या दैवंताची स्मारकं उभारता तसंच आमच्या सोयींसाठी काम केलं पाहिजे,” असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले.

“पक्ष बदलणाऱ्याला पाच वर्ष कोणतंही पद देऊ नका, एकही माणूस पक्ष बदलणार नाही. पण आमच्याकडे ते नियमच नाहीत. दरवर्षी मी निवडणुकीत निवडून आलो, आमदार, मंत्री झाल्यानंतर पुढील वर्षी माझी संपत्ती किती हे दिसायलाच पाहिजे. निवडून येण्याआधी ५० आणि नंतर १५० किलो वजन का झालं? हा प्रश्न विचारायला पाहिजे,” असं नाना पाटेकर म्हणाले.


तुम्ही वेगवेगळ्या पक्षातील चांगल्या लोकांनी एकत्र या आणि एक वेगळा पक्ष स्थापन करा असा सल्ला नाना पाटेकरांनी देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. आम्ही मत दिलं असून फक्त आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी याचना करावी लागू नये याची काळजी घ्या असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

“इतिहासाच्या नावाखाली काही नतद्रष्ट विकृतीचे रंग पेरत असतात. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माच्या द्वेषावर आधारित नसावा. मी जन्माने हिंदू असून मरणारही हिंदू आहे. पण मी इतर धर्मांचाही आदर करतो,” असं सांगताना नाना पाटेकरांनी महाराजांचा इतिहास वाचा असा सल्ला दिला.


bottom of page