ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही - महादेव जानकर
मुंबई: ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आज (रविवारी) राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीनं राज्यभर जेलभरो आणि चक्काजाम करून निषेध व्यक्त करण्यात आला. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिला.
महादेव जानकर यांच्या नेतृत्वात रासपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मानखुर्द येथे प्रचंड चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. हातात पिवळे झेंडे घेऊन रासप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.
यावेळी जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नसल्याचे सांगितले. ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांना निधी मिळाला पाहिजे. तसेच ओबीसींना त्यांची आर्थिक आणि सामाजिक भागीदारी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे, असं सांगतानाच एनडीए असो की यूपीए… ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही. असं जानकर म्हणाले.