ओवेसींवरील हल्ल्याचं कारण आलं समोर...
‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून सचिन आणि शुभम अशी या हल्लेखोरांची नावं असून ओवेसी यांच्या भाषणांमुळे त्यांच्यात चिड निर्माण झाली होती. तसंच ओवेसींवर हल्ला करण्यासाठी गेल्या अनेक काळापासून ते तयारी करत होते. याचसाठी ते ओवेसींच्या प्रत्येक सभेला हजेरी लावत होते.
आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून ओवेसींचा पाठलाग करत होते, पण त्यांना हल्ल्याची संधी मिळत नव्हती. जेव्हा ओवेसी मेरठमधून दिल्लीला परतत होते तेव्हा त्यांची गाडी टोलनाक्यावर थांबली होती. हीच संधी लक्षात घेता आरोपींनी वाहनावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर ओवेसींची कार पंक्चर झाली आणि त्यानंतर ते दुसऱ्या वाहनाने रवाना झाले. असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. “यामागे कोण आहे? कोणाचं डोकं आहे? आणि हल्ल्याचं कारण काय? या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे. असंही ते म्हणाले
दरम्यान, खासदार असदुद्दीन ओवेसींवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून ओवेसींची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ओवेसींच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांना CRPF ची 'झेड' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा आदेश तातडीने लागू केला आहे, याबाबत एएनआयने वृत्त दिलं आहे.