सावधान! पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या २४ तासात ३ फुटांनी वाढ
कोल्हापूर : गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर वाढल्याने नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होऊ लागली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात तीन फुटांनी वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १७ बंधारे पाण्याखाली आहेत.
काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊ लागले असून कळंबा तलावही ओव्हर फ्लो झाला आहे. कित्येक दशके कोल्हापूर शहराची पाण्याची गरज पूर्ण करणारा कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्याच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. प्रशासनाने पर्यटकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.