अन् पंकजा मुंडेे झाल्या भावुक...
मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे या दोघी भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरु होती. यावर आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, यावेळी बोलता बोलता स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
प्रीतम मुंडे यांना डावललं गेल्याचा मुद्दा उपस्थित होताच पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंसोबतची एक आठवण सांगितली. ही आठवण सांगताना त्या भावुक झाल्या. “गोपीनाथ मुंडे निवडून आले, त्या निवडणुकीला मी एकटीच होते. आमच्या इथे जिल्ह्यात आमदार नव्हता. माझ्या पायाला फोड आले होते आणि मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला आहे”, हे सांगताना त्यांचा गळा दाटून आला अन् त्या क्षणभरासाठी थांबल्या. “प्रीतमताई वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारच होत्या. पण आत्ता जी निवडणूक त्या जिंकल्या, ती निवडणूक त्या त्यांच्या मेरिटवर जिंकल्या.प्रीतम मुंडे राजकारणात मिरवण्यासाठी नाही आल्या. त्या लोकांना शांत करण्यासाठी आल्या. तरीही प्रीतम मुंडे निवडणुकीच्या उमेदवार आहेत की नाही इथून चर्चा होते”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं. मात्र, खासदारकीची शपथ घेण्याआधीच त्यांचं अपघाती निधन झालं. याविषयी बोलताना देखील पंकजा मुंडेंना गहिवर अनावर झाला. “मुंडे साहेबांना शपथही घेता आली नाही. ते निवडून आले आणि ३ जूनला ते गेले”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.