लॉकडाऊनला राष्ट्रवादीचा विरोध
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारकडून लॉकडाऊनचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा याला विरोध आहे. राज्याला आणि जनतेला लॉकडाऊन परवडणारा नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी इतर पर्यायांचा विचार करावा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्यास सांगितलं आहे. पण याचा अर्थ लॉकडाउन अपरिहार्य आहे असं नाही. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकतो. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून एका दिवसात ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊन हे राज्याला, जनतेला कोणालाच परवडणारं नाही. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचा आग्रह धरला आहे. असं नवाब मलिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
कोरोनाला नियंत्रणात आणण्याचे आव्हान महाविकास आघाडी सरकारपुढे आहे. लॉकडाऊनऐवजी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी परिस्थितीनुसार कठोर निर्बंधांवर भर देण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.