परमबीर सिंह यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाने झटका दिला आहे,.परमबीर सिंह यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या चौकशीविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये सेवेसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन आणि भ्रष्टाचाराचे आरोप अशा दोन प्रकरणांचा समावेश आहे. मात्र, ही याचिका ‘नॉन मेंटेनेबल’ असल्याचं नमूद करत न्यायालयानं ती फेटाळून लावली आहे.
“राज्यातल्या महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण आपण उघड केल्यामुळेच आपल्याला लक्ष्य करण्यासाठी हे आरोप ठेऊन तपास केला जात आहे”, असा दावा परमबीर सिंह यांनी या याचिकेमध्ये केला होता. मात्र, याविरोधात राज्य सरकारने बाजू मांडताना “या विषयासंदर्भात दाद मागण्यासाठी न्यायालय नसून सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल हीच योग्य जागा आहे. कारण परमबीर सिंह यांनी सेवेत असताना केलेल्या काही चुकीच्या गोष्टींविषयी त्यांची सेवांतर्गत चौकशी सुरू आहे”, असं न्यायालयाला सांगण्यात आलं.