जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?
राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर काय उपाययोजना करता येतील ह्यासंबंधीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.. ह्या पत्रामधून राज ठाकरे यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली आहे. तसंच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण करावं तसंच खासगी संस्थांनाही लस खरेदीची परवानगी दिली जावी अशी मागणीही त्यांनी मोदींकडे केली आहे.
राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून १ मे पर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.
मोदींना पाठवलेल्या पत्रात राज ठाकरेंनी काय म्हंटलं ?
महोदय,
गेल्या वर्षी कोव्हीड-१९ ची साथ सुरु झाल्यापासून महाराष्ट्र राज्याला या साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले होते. तेव्हापासूनच महाराष्ट्रात, निव्वळ आकड्यांमधे मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यू देखील झाले आहेत. आज सारा देश कोव्हीड-१९च्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट आहे.
कोव्हीड-१९ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण अजूनही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?
या पार्श्वभूमीवर करोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १००% लसीकरण करण्याची रणनिती महाराष्ट्रासाठी महत्वाची, व कळीची आहे. म्हणूनच, महाराष्ट्राला १००% लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून, राज्यातल्या सर्व वयोगटातील १००% लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवंय. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, विशेषतः कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ तर हवीच.
म्हणून माझी केंद्राकडे मागणी आहे की -
अ) महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या;
ब) राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात;
क) 'सिरम'ला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी;
ड) लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हॉफकिन व हिंदुस्तान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी; आणि
इ) कोव्हिड-१९ रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा
पुरेस पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.
या कोव्हिड-१९च्या साथीमुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला तिथल्या स्थानिक परिस्थितीनूसार धोरण आखण्याची गरज आहे. 'आरोग्य' हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहनच श्वे. यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, ज्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल.
या सर्व सूचनांकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पहाल व प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा, नव्हे, खात्रीच आहे!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
आपला नम्र,
राज ठाकरे अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना